Tuesday, October 25, 2011

बाबूराव बागुलांच्या साहित्याविषयी...



मराठी वाड्मयकोशात बाबूराव बागुलांच्या साहित्याविषयी असलेली माहिती अशीः

ग्रामीण भागातील अस्पृश्यतेचे दाहक चटके आणि मुंबईतील झोपडपट्टीच्या जीवनाचा विदारक अनुभव घेतलेल्या बाबूराव बागुलांचे लेखन १९५२ च्या सुमाराला प्रकाशित होऊ लागले. युगांतर, नवयुग, अस्मितादर्श इत्यादी नियतकालिकांतून त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या. जेव्हा मी जात चोरली होती (१९६३) व मरण स्वस्त होत आहे (१९६९) या दोन कथासंग्रहांतील कथांतून बागुलांच्या लेखणीचे सामर्थ्य लक्षात येते. जेव्हा मी जात चोरली होती, दस-याचा रेडा, मरण स्वस्त होत आहे, कवितेचा जन्म, गुंड, विद्रोह, प्रेसूक इत्यादी त्यांच्या कथा वाचकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणा-या आहेत.
मानवी मनातील क्रोध, हिंसा, सूड, वासना, स्वार्थ यांना बळी पडणारी माणसे आणि त्यांच्या जीवनाची अवकळा बागुलांच्या कथांचा विषय बनतात. मरण स्वस्त होत आहेसारखी कथा मुंबई महानगरीचे बकालपण चित्रित करते. त्यांच्या अनेक कथांमधून पुरुषसत्तेने केलेले स्त्रीचे अनेक पातळ्यांवरील शोषण मांडले जाते. मुरळी, वेश्या, पुरुषांच्या वासनेला बळी पडणा-या स्त्रिया त्यांच्या कथांत येतात. दलितांबरोबरच ख्रिश्चन, मुस्लिम, झोपडपट्टीत जीवन कंठणारी, वर्गसत्तेचे बळी होऊन जीवन कंठणारी भुकेली माणसेदेखील बागुलांच्या कथेत प्रामुख्याने येतात. दुःख हे शोषणातून निर्माण होते, ही त्यांची भूमिका आहे.
सूड (१९७०) या दीर्घकथेतील जानकी हीही लैंगिक शोषणाच्या चक्रातून पिळवटून निघते. नाट्यमय घटना, आवेगपूर्ण निवेदन, उत्कट, काव्यात्म भाषाशैली यामुळे बागुलांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. अघोरी (१९८०) ही ग्रामीण समाजाचे दाहक वास्तव चित्रिणारी कादंबरी. दलित साहित्य ः आजचे मानवी विज्ञान (१९८१) हे पुस्तक, आंबेडकर भारत (१९८१) हे जातककथांच्या धर्तीवरचे चरित्रात्मक कथाग्रंथही त्यांच्या नावावर आहेत. वैचारिक बांधिलकी ठेवून लिहिणारे लेखक म्हणून बाबूराव बागूल वेगळे ठरतात.

No comments:

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons