Saturday, December 10, 2011

नवा सूर्य कवेत घेताना


' शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' हा मंत्र देत दलित समाजाला आत्मसन्मानाची दिशा दाखवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मंगळवारी, ६ डिसेंबरला महापरिनिर्वाणदिन. त्यानिमित्त आजच्या पिढीतील दलित तरुणाईच्या आशा, आकांक्षा, स्वप्नं आणि स्पंदनं टिपणारा हा लेख.
...............

   येत्या ६ तारखेला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी भारतभरातून लाखोंचा जनसमुदाय चैत्यभूमीवर आपल्या लाडक्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी एकत्र येतील. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा तेजस्वी सूर्यच अस्ताला गेला होता. इतिहासाच्या एका गौरवशाली अंकाचा शेवट आणि बापाविना पोरक्या झालेल्या समाजाचा कधीही न थांबणारा संघर्ष सुरू झाला. आज त्यांना अर्धशतकाहून अधिक काळ लोटला असला तरी बाबासाहेब नावाच्या वादळाचा झंझावात तसूभरही कमी झालेला नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा चा मूलमंत्र मिळालेला आंबेडकरी समाजातील तरुण अजूनही अपेक्षित विकास साधू शकलेला नाही. एकूणच या तरुणांच्या सांप्रत स्थितीतील जगण्याच्या पातळीवरील समस्या आणि समकालिन प्रश्नांचा मागोवा प्रातिनिधिक स्वरुपात घेणे यानिमित्ताने उचित ठरेल. 
राजकीयदृष्ट्या सर्वाधिक सजग असणारा तरुण वर्ग बाबासाहेबांच्या हयातीनंतर रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीच्या राजाकारणाला, राजरोसपणे होणार्‍या अत्याचारांना कंटाळला होता. ७० च्या दशकात याच तरुणांनी कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारत समाजाला दलित पँथर चा पर्याय दिला. आपसूकच रिपब्लिकन चळवळ ते दलित चळवळ असे ट्रान्सफॉर्मेशन घडून आले. पहिल्यांदाच प्रस्थापित व्यवस्थेला नाकारण्याची धमक दलित पँथर ने तरुणांना मिळवून दिली. पण येरे माझ्या मागल्या करत दलित पँथर देखील फाटाफुटीच्या राजकारणाला बळी पडली. परत रिपब्लिकन पक्षाचा आश्रय घेत आजमितीला ४४ गटांमध्ये पक्ष विभाजित झाला आहे. बाबासाहेबांनतर बहुजन वर्गाला सर्वंकष नेतृत्व आजतागायत मिळालेले नाही. राजकारणाबद्दल मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या अनास्थेला रिपब्लिकन नेतेच जबाबदार आहेत. ह्या नेत्यांनी समाजाला कधीच अर्थकारण मिळवून दिले नाही. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसारख्या दमदार शिक्षणसंस्था उभारल्या नाहीत. उत्कृष्ट लेखकांना कधीही प्रोत्साहन दिले नाही. प्रशासकीय, सनदी सेवेतील अधिकारी घडवणार्‍या किती संस्था स्थापन केल्या हा देखील गहन प्रश्न आहे. खेड्यापाड्यात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारे किती इस्पितळे उभारण्यासाठी पुढाकार घेतला किंवा त्यासाठी किती आंदोलने केली? सामाजिक अस्मितेच्या नावाखाली दिली ती फक्त आंदोलने, पण पोटासाठी भाकरी मिळवून देण्यात मात्र सारेच अयशस्वी ठरले. रिपब्लिकन नेते खुद्द हे वास्तव नाकारणार नाहीत. नवे उद्योगधंदे व नव्या दमाच्या उद्योजकांना वाव देण्याचे औदार्य दाखविलेले नाही. कार्यकर्ते केवळ बॅनरबाजीसाठी, आत्मदहन करण्यासाठी, सभेला गर्दी जमवण्यासाठी पण त्यांच्या विकासासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. बाबासाहेबांनी एकदा म्हटले होते. “Political power is such a master key by which you can open each and every lock.”  सत्तेचा हव्यास हा फक्त स्वतःचा पोकळ आत्मभिमान शमवण्यासाठीच केला जात आहे.
आरक्षणाचा प्रश्न, खाजगी विद्यापीठांचा प्रश्न, खाजगीकरणाची लाट, रमाबाई नगर हत्याकांड, खैरलांजी हत्याकांडातील पीडीतांना, वंचितांना न्याय मिळाताना दिसत नाही. त्यासाठी कोणी खास प्रयत्न करत असल्याचेही दिसत नाही. राजरोसपणे अॅट्रोसिटीची प्रकरणे घडतच आहेत. क्रिडा क्षेत्रात प्रतिनिधित्व नाही. माध्यमजगातातलं दुय्यम स्थान, दिवसेदिवस महाग होत जाणारी शिक्षणव्यवस्था, छुप्या पद्धतीने समाजव्यवस्थेत उपलब्ध असलेली जातीयता, समाजव्यवस्थेकडून, न्यायव्यवस्थेकडून होणारी उपेक्षा  आंबेडकरी तरूणाला सर्वांगीण विकासापासून दूर लोटत आहे. नामांतराचा विषय वेळपरत्वे पेटवणार्‍या राजकीय पक्ष मागासवर्गीयांसाठी घोषित झालेल्या योजनांमधील भ्रष्टाचारावर रान उठवित नाही. ठराविक अपवाद वगळता काही स्वार्थलोलूप राजकारण्यांनी स्वाभिमानी आंबेडकरी तरुणाला निवडणूकीच्या काळात हमखास उपलब्ध असलेली कार्यकर्त्यांची एकनिष्ठ फौज, त्यांची एकगठ्ठा मते, विश्वासू व्होट बँक असा बहाल केलेला अपमानास्पद दर्जा त्याला निराश बनवत आहेत. परिस्थिती निराशाजनक असली तरी पूर्णतः कुचकामी बनलेली नाही. शेवटी अंधारातूनच आशेचा किरण उगवत असतो.
स्वातंत्र्यापेक्षा काहीच उच्च नाही, गुलामीपेक्षा काही नीचतम नाही. स्वातंत्र्याचा आस्वाद घेणे ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. बाबासाहेबांच्या चळवळीने विचारस्वातंत्र्य बहुजन समाजाला दिले. विचारशक्तीच्या जोरावर सुशिक्षित तरुणाने दलित ही ओळखवजा कलंक पुसून टाकताना स्वतःची  ओळख आंबेडकरी तरूण म्हणून प्रस्थापित करण्याचा चंग बांधला आहे. जातीधर्माआधी भारत अग्रस्थानी ठेवून संविधान राष्ट्राचा, पर्यायाने प्रत्येक नागरिकाचा आद्यग्रंथ मानणारा, अंगिकार करणारा, सदैव संविधान संरक्षणार्थ तयार असणारे हे युवा बुद्धांचा अतःदिप भव हा संदेश अंगिकारून स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जागतिकरणाच्या समस्यांनी ग्रासलेले असताना सध्याचा लढा हा केवळ जातीअंतापुरता मर्यादित न ठेवता त्याच्या कक्षा खाजगीक्षेत्र विरुद्ध सार्वजनिक क्षेत्र अशा रुंदावण्याची तयारी देखील करून ठेवलेली आहे. बहुजन तरुणांनी खासगी क्षेत्रात उद्योगशीलता जपल्याशिवाय भारताचा उद्धार होणार नाही. स्वतः उद्योजक झाल्याशिवाय देशातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आपण कायम असमर्थ ठरणार आहोत हे या पीढीने अचूक हेरले आहे. त्यातूनच मिलिंद कांबळेंसारखे धडाडीचे उद्योजक पुढे आले. त्यांच्या प्रयत्नांतून जन्माला आली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज(डिक्की). 'Be job givers instead of job seekers' हे डिक्कीचे ब्रीदवाक्य. स्वयं प्रतिभेने जागतिकीकरणाच्या संधींचा फायदा घेउन हा तरुण वर्ग आपले कर्तृत्व सिद्ध करू पाहत आहे.  
       आज भारतातील सारा बहुजन समाज माध्यमविरहीत आयुष्य जगतोय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्वतःचे माध्यम नाही म्हणून व्यक्त होता येत नव्हते. परंतू सोशन नेटवर्किंग साईट्स चा आधार घेत आपले स्वतःचे माध्यमविश्व उभारुन माध्यमजगतातलं नवं आणि प्रभावी इवॉल्यूशन घडवणारे हेच तरुण होय. स्वातंत्र्यापूर्वी शिक्षण एक आव्हान होते पण युवावर्गाने जबाबदारीने शिक्षण ही आजची मूलभूत गरज असल्याचे समाजमनावर स्पष्टपणे प्रतिबिंबित केले आहे. पण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी लागणारा प्रयत्न करताना मात्र ही पीढी उदासीनता बाळगते आहे. इंग्रजी आंतरारष्ट्रिय व्यवहारातील भाषा, ती आत्मसात करणे व जे जाणीत नाहीत त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यासाठी आवश्यक स्त्रोत उपलब्ध करुन देणे तितीकेच महत्त्वाचे आहे. शिकून पदव्या मिळविल्या, स्वतःचा उत्कर्ष झाला म्हणजे सारा समाज सुधारला असेही होत नाही. खाजगीकरणाचा वाढता रेटा हा जातीयतेच्या व शोषकांच्या व्यवस्थेला घट्ट करणारा आहे. त्यासंदर्भात मेनस्ट्रिम मधले आपण मुठभर तरुण पुन्हा आपल्या मुळांकडे जाण्यास तयार आहेत का ? तेथील लोकांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत का? वर्तमान स्थितीतील आव्हाने झेलण्यासाठी आपण त्यांची मनगटे मजबूत करणार आहोत का ?
स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेच्या चक्रव्यूहात आपल्या दोन पिढ्या बरबाद झाल्या. आंबेडकरी वर्गाकडे स्वतःचे असे राजकीय तत्त्वज्ञान आहे. राजकीय समज आहे. मग अजूनही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांत पीछेहाट का ? सत्ता-आसक्ती ला झुगारून नैतिक जीवन मुल्ये रुजवून तत्वज्ञानाचा पाया मजबूत करण्याची गरज आहे. जेणेकरून कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याचे धाडस त्यांच्यात निर्माण होईल. याच आंबेडकरी समाजाने भारत देशाला डॉ. मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधवांसारखे अर्थतज्ञ दिलेत. कल्पना सरोज सारख्या यशस्वी उद्योजक दिलेत. नामदेव ढसांळ, लक्ष्मण मानेंसारखे क्रांतिकारी कवी-लेखक दिले आहेत. अनेक नावाजलेले सनदी अधिकारी, विद्वान हे आंबेडकरी चळवळीने या देशाला दिलेली देणगीच आहे. हा वारसा पुढे चालवत आंबेडकरी तरुणाने स्वविकास साधल्यानंतर समाजाप्रती असलेले उत्तरदायीत्व पूर्ण करायलाच हवे. समाजबांधवांच्या समस्यांप्रती संवेदनशील राहणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ ही केवळ महारांची, बौद्धांची चळवळ म्हणून सीमीत न ठेवता तीचे रुंदीकरण सार्‍या मागासवर्गाच्या समावेशात केले जावे. कोणताही राजकीय पक्ष हा कणखर, खंबीर नेतृत्वाच्या बळावर यश संपादन करत असतो. हे नवे नेतृत्व घडवण्यासाठी आत्ता युवावर्गालाच पुढाकार घ्यावा लागेल.  किती दिवस इतर जातीय बांधवांच्या नावांने आपण बोटे मोडायची, राजकीय नेतृत्वाला, प्रस्थापित व्यवस्थेला दूषणे देणार? स्वर्ग पहायचा असेल तर बलिदान तर द्यावेच लागेल. नवनिर्माणासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चौफेर अभ्यासण्याची गरज आहे. आजवर केवळ कायदेतज्ञ म्हणून माहित असलेले बाबासाहेब हे उच्च दर्जाचे अर्थतज्ञ होते, त्यांची संरक्षण विषयक तत्वज्ञानाची महती आज जगाला कळून चुकलीये, अशा  बहुआयामी बाबासाहेबांचा आधुनिक आदर्श निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. चळवळीचे तत्त्वज्ञान व कार्यपद्धती ही एकप्रवाही न ठेवता चळवळीची मेथेडोलॉजी सर्वंकष स्विकाराहार्य व बहूप्रवाही करण्यावर भर द्यावा लागेल. बु्द्धप्रणीत समाजक्रांतीचा अवलंब करावा लागेल. तो करण्यास आपण तय्यार आहोत का ?    
       आज आंबेडकरी  समाजातील राजकीय, सामाजिक नेतृत्व रसातळाला गेले असल्याची कठोर भावना या तरुण पीढीत घर करून आहे. खरे तर हा चळवळीचा नव्हे, चळवळ चालवणार्‍यांचा पराजय आहे. ही परिस्थिती बदलणे सर्वस्वी तरुणांच्या हातात आहे. जोवर तरुण स्वतः ग्राउंड रिएलिटीला स्विकारत नाही तोवर सर्व स्तरांत नेतृत्वबदल घडून येणे अशक्य आहे. रसातळाला गेल्यावर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेण्याची जिद्द ही आपल्यात आहे हे अंगी बाणवावे लागेल. लढ्यासाठी सज्ज व्हावे लागेल. बाबासाहेबांनी घडवलेल्या सोनेरी युगाचा, जाज्वल्य अभिमानाचा, आत्मभिमान जागृत करणार्‍या संघर्षाचा, यशापयशाचा, समस्यांचा अभ्यास करावा लागेल                                   .                      
मानवमुक्तीच्या लढ्यासाठी न्याय हक्कांसाठी लढा पुकारावा लागेल. मानवमुक्तीच्या सर्वंकष लढ्यातूनच आधुनिक लढ्याच्या नव्या दिशा जन्म घेतील..
वैभव छाया


सदर लेख हा मटा मध्ये प्रसिद्ध झाला होता. 
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10975367.cms

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons