Showing posts with label बाबागिरी. Show all posts
Showing posts with label बाबागिरी. Show all posts

Thursday, June 9, 2011

बाबा रामदेव की जय - भाग ५

               संपूर्ण दिवसभर अत्यंत जोशात चाललेल्या आंदोलनाला रात्री मात्र गालबोट लागले. सत्तेचे गुंगीने माजलेल्या काँग्रेसी भांडवलदारांनी दिल्ली पोलिसांना हाताशी धरून निर्दयीपणे लाठीमार करत आंदोलन अक्षरशः चिरडून काढले. त्याचा जाहीर धिक्कार असो. बाबा रामदेव यांच्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणत जबरदस्तीने त्यांची रवानगी हरिद्वारला केली. सुरूवातीला नेमके का चाललंय याचा काहीच अंदाज लावता येत नव्हता. एक अंदाज तर ठरलेला होता, की येणार्‍या दिवसांत भारतीय राजकारणात मोठ्या उलथापालथी पहायला मिळणार... एकुणच अण्णांची उपोषण सेना आणि बाबा रामदेव यांची रामसेना ह्या सेल्फ मेड सिविल सोसायटीच्या दोन्ही गटांमागे शिजत असलेल्या राजकारणाचा हा मागोवा..
       ज्येष्ठ काँग्रेसी दिगविजय सिंग, कपिल सिब्बल, प्रणब मुखर्जी सिविल सोसायटीने उभारलेल्या प्रत्येक आंदोलनाला काउंटर करण्यासाठी पुढे येतायेत, पण यांच्यापेक्षा मुरब्बी असलेला पी चिदंबरम नावाचा भांडवलवाद्यांचा दलाल नुकत्याच तीन राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांपासून एक साधी प्रेस काँन्फरंस घेत नाही याचे आश्चर्य वाटत होते.  कारण ज्या पद्धतीने डिएमके ला बोलण्यात, प्रचाराच गुंगवून ठेवून, दुसर्‍या बाजूने सीबीआय चा फास आवळून करुणानिधींचा काटा काढण्याचा मास्टर प्लान तयार करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर आपले गृहमंत्रीच होय. एवढे सगळे सांगण्याचे कारण असे की, दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या लाठीमारा कांडावर प्रतिक्रिया देण्यासाठी वास्तविक पाहता केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढे यायला हवे होते, पण त्यांच्याऐवजी कपिल सिब्बल पुढे आले.  रामदेव बाबांचा हठयोग आणि अण्णांचे उपोषण हे एव्हाना राजकीय पाठिंब्यावर उभे पाहीलेले षडयंत्र आहे हे हळूहळू जगासमोर यायला लागले आहे. या एकुण प्रकारावर पत्रकार सुजय शास्त्री यांनी केलेली कमेंट बरेच ताही सांगून जाते. ती कमेंट मी येथे जशीच्या तशी देत आहे.
      “बाबा रामदेव हे उत्तम उद्योजकही आहेत. त्यांच्या नावावर सुमारे २०० हून अधिक उद्योग असून त्यांच्या हरिद्वारमध्ये बेनामी अनेक प्रॉपर्टी आहेत. सरकारने मनात आणलं तर त्यांचा एका दिवसात सगळ्या बुरखा फाटू शकतो. बाबा रामदेवांनी मीडियामधून आपणं निष्कलंक असल्याची एक इमेज तयार केली आहे. या इमेजचा सरकारला सध्या त्रास होतोय. या बाबाच्या खुळचटपणामुळे भ्रष्टाचाराचा मूळ उद्देश मागेच राहिला आणि सरकार विरोधातलं नवं राजकारण सुरू झालयं. या रामदेवाला स्वतःचा राजकीय महत्त्व वाढवायचं आहे. या महत्त्वाला परिसस्पर्श करण्याची घाई भाजप, संघवाल्यांना झाली आहे. पण कालांतराने हे हिंदूत्व वादी पक्ष त्यांना गुंडाळणार हे सांगायला नको . हा सगळा संघाचा सुनियोजित डाव आहे. सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरायचं, आणि मध्यावधी निवडणुका घ्यायच्या असं सरळ राजकारण आहे.

     वरिल कमेंट मधून एक गोष्ट लक्षात येण्याजोगी आहे ती म्हणजे या आंदोलनाआडून चालणारे राजकारण. त्या राजकारणाची शक्यता कदाचित पुढीलप्रमाणे असू शकतात..     
1.   काँग्रेस इतकी दुधखुळी नाही की केवळ सुडापोटी बाबा रामदेव यांच्या गर्दीवर बेछूट लाठीहल्ला करेल. हा लाठीहल्ला करण्यामागे अतिशय सुनियोजित डाव असल्याचे आत्ता दिसायला लागलेय.
2.       बेछूट लाठीहल्ला झाल्यानंतर बाबा रामदेवांनी अतिशय चलाखीने भ्रष्टाचाराचा मुद्दा बाजूला सारत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणारे स्टेटमेंट सुरू केले. त्यातले पहिले स्टेटमेंट म्हणजे काँग्रेस माझे एन्काउंटर करणार आहे. आत्ता मी काँग्रेसचा विनाश केल्याशिवाय शांत बसणार नाही. भ्रष्टाचारावर बोलण्याऐवजी स्वतःच्या अस्मितेवर भाष्य करून ब्लॅकमेलिंग करण्याचा उद्योग सुरू केला आहे.

3.       आजच म्हणजे ८ जून २०११ रोजी त्यांनी ११,००० तरूणांची शास्त्र आणि शस्त्र युक्त सेना उभारण्याची घोषणा केली. एक प्रकारे फॅसिस्ट विचारसरणीच्या आरएसएस ला पर्याय उभारून देण्याचीच भाषा केली गेली.

4.       भाजप आणि संघाचा पाठींबा असलेला हा भ्रष्टाचार विरोधी लढा पूर्णपणे भाजपच्या पथ्यावर पडेल असे दिसत असताना अचानकपणे बाबा रामदेव यांनी निर्माण केलेल्या ट्विस्टमुळे त्यांच्या सर्व मनसुब्यांवर पाणी पसरताना दिसू लागलेय.   

5.       कालपरवा पर्यंत भ्रष्टाचारविरोधी हाच मुख्य गाभा असलेला लढा मिडीयाने RAMDEV v/s UPA  असा प्रोजेक्ट करायला सुरूवात केली.

6.       यात लक्षात येणारी महत्त्वाची दुसरी बाजू अशी की, रामदेव बाबानी या आधीच भारत स्वाभिमान संघटन नावाचा राजकीय पक्ष उघडून ठेवलाय. येनकेन प्रकारे आत्तापर्यंत योगागुरू असलेले रामदेव आत्ता हळूहळू संघीय विचारसरणीचे नेते बनू लागले आहेत. मिडीयाच्या साथीने येत्या आठवड्याभरात हिंदूत्ववादी नेत्यापर्यंतचा त्यांचा प्रवास देखील पूर्ण झालेला असेल.

7.       एव्हाना पी चिदंबरम पण लुंगीला गाठ मारून मैदानात आलेत. बाबांच्या सेनेविरुद्ध कारवाई करण्याची घोषणा करून टाकली. मुळात पॉलिटिकल न्यूज मध्ये केवळ बाबाच लाईम लाईट मध्ये राहतील अशाच प्रकारची वक्तव्ये करण्याचा सपाटाच या काँग्रेसींनी लावलाय.

8.       जर येणार्‍या निवडणुकांत बाबा रामदेव सर्व शक्तीनिसी मैदानात उतरले तर काँग्रसचेच भले होणार आहे. कारण स्वातंत्र्योत्तर काळापासून काँग्रेसचा ठराविक असा इमानदर मतदारवर्ग राहीलाय तो कधीच अन्य पर्याय स्विकारत नाही.

9.       वरिल स्थिती पाहता, रामदेव बाबा जरी निवडणुका लढले तरी भाजपच्याच मतांची विभागणी होईल. अशा पक्क्या राजकारणाची खेळी आखुनच काँग्रेस मैदानात उतरल्याचे दिसतेय.     
        
                        एकुणच काय ? यात सामान्य माणसाचे कुठेच भले होणार नाहीये. आधी भ्रष्टाचाराच्या ओझ्याखाली दबल होता, आत्ता या मुठभर सोवळ्यांच्या हुकूमाखाली दबतोय. लक्षात घ्या, येणार्‍या निवडणुकांत आपण मतपेटीतून भडवेगिरी करणार्‍या भ्रष्टाचार्‍यांना त्यांची लायकी दाखवू शकतो. पण सत्तेच्या उन्मादात जर उद्या ह्या सेल्फ मेड सिविल सोसायटीने हुकूमशाही आणली तर आपल्याकडे त्यांना हटवण्याचा कोणताही पर्याय शिल्लक नसणारेय. आपण आपल्या मताच्या ताकदीवर इंदिरा गांधीना देखील  नाकारले, अटलबिहारी वाजपेयी सारख्या मुत्त्सद्दी माणसाला देखील नाकारण्याची हिम्मत दाखवू शकलो. पण भविष्यात या सिविल सोसायटीला आपण कोणत्याही पातळीवर नाकारू शकत नाही. तुमच्या मनातला राग दाबून ठेवा योग्य वेळी बाहेर पडण्यासाठी.     


Wednesday, June 8, 2011

बाबा रामदेव की जय - भाग ४

       आत्तापर्यंतच्या एकुण तीन भागात मी बाबा रामदेव यांच्या संपूर्ण आंदोलनाची रुपरेषा विषद केली. ज्या पद्धतीने सरकाने दडपशाही करून लोकशाहीला निषेधार्ह असणार्‍या कृत्याचा वापर करून आंदोलन चिरडून काढले त्याचा जाहील निषेध ही केला. पण आत्ता मात्र या एकुण आंदोलनाचे खरे रुप समोर यायला लागलेय. या आंदोलनामागून चालणारी राजकारण्यांच्या अराजकीय खेळीचे चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेय.
       आमच्या पिढीने (मला येथे ग्लोबलायझेशन नंतर वाढलेली पिढी अपेक्षित आहे.) अनेक उत्कृष्ट वक्ते पाहीले. अव्वल दर्जाचे कम्युनिकेटर पाहीले. पण रामदेव बाबा हे सर्वात हाय क्वालीटीचे, इंप्रेसिव, प्रभावशाली असे कम्यूनिकेटर आहेत. पण त्याहीपेक्षा एक उत्तम मिडीया ऑर्गनायजर म्हटले तर वावगे ठरणार नाही. माझे म्हणणे पटत नसेल तर बाबांनी रामलीला मैदानावर केलेल्या सर्व पत्रकार परिषदा पहा. यु ट्यूब वर पाहून घ्या. मला या बाबतीत माझे मित्र प्रा. दिलीप मंडल यांनी केलेले विधान फार महत्त्वपूर्ण वाटते ते असे की,  
बाबा दरअसल रामलीला मैदान में एक बड़ा सीन डायरेक्ट करते नजर आते हैँ। बाबा के क्लोज शॉट को जूम आउट करते ही जो चार-पांच चेहरे दिखते थे उसमें पक्के तौर पर कोई मौलाना होता था। बाबा जैसे ही कुछ बोले और भीड़ की प्रतिक्रिया हो, अद्भुत परफेक्शन के साथ भीड़ को फोकस करने वाला शॉट स्विच कर दिया जाता था। न्यूज चैनलों से बेहतर कैमरा डायरेक्शन और स्विचिंग वहां हो रही थी।
सामान्य वाचक पत्रकारीतेला किंवा पत्रकार परिषदेला कधीच म्हणावा तसा सिरीअसली घेत नाही. कारण जर सिरीअसली घेतले असते तर मिडीया एवढ्या सहजासहजी कदीत कोणाला नॅशनल हिरो बनवू शकली नसती. गेल्या दोन लोकसभांपासून कॉंग्रेस पक्षाने जो दांभिकपणा चालवलाय तो लोकांसमोर एवढा सहजासहजी आलेला नाही. पण प्रेस कॉंन्फरंस हा सिरीअसली घ्यावा असाच विषय आहे. कोणत्याही प्रकारच्या आयोजनामध्ये एक प्रकारचा जूगारच असतो. मटकाच म्हणा हवा तर.. लगा तो तीर नही तो नंगा फकीर... पत्रकार परिषदेला पत्रकारांनी संगनमताने डच्चू दिला तर अख्खे आयोजन पाण्यात जाते. पण जर का पत्रकार परिषद यशस्वी झाली तर ती एखाद्या सभेपेक्षाही जास्त इंम्पॅक्ट क्रिएट करू शकते. पण प्रेस कॉन्फरंसचा वापर प्रत्येकालाच प्रभावीपणे करता येतो असे नाही, जर असे असते तर मुंबई मराठी पत्रकार संघात आठवड्यागणिक शेकडो परिषदा होतात पण सगळ्यांनाच कव्हरेज मिळतेच असे नाही. पण बाबा रामदेव यात एकदम उस्ताद माणूस.
       जेव्हा जेव्हा प्रेस कॉन्फरंस बोलावली गेली तेव्हा तेव्हा त्याचा अचूक वापर बाबा रामदेव यांनी केला. प्रेस कॉन्फरंसला आलेले रिपोर्टर अचानक एखाद्या स्क्रिप्ट मध्ये लिहील्या गेलेल्या कॅरेक्टरप्रमाणे वागवले गेले. किंबहूना ते तसे वागतील यासाठी आवश्यक असणारी सारी परिस्थिती निर्माण केली गेली. कॉन्फरंस चालू असतानाच बाबा उपोषणकर्ते आणि पत्रकारांचे प्रश्न अशा दोन्ही आघाड्या लिलया सांभाळत होते. उपोषणकर्त्यांच्या घोषणांचा आवाज मोठा झाला रे झाला की बाबा स्मितहास्य द्यायचे. त्याचवेळी लाँग शॉट वर असलेला कॅमेरा बाबांचा क्लोज अप टिपायचा. या आवाजात कितीतरी वेळा पत्रकारांचे जटील प्रश्न दाबले गेले. प्रश्न विचारत असताना एखादा अडचणीत आणणारा प्रश्न आला की बाबांचे ठरलेले उत्तर तयार असायचे ते असे... आप लोग आपस में झगड़ा मत कीजिए। आप आपस का झगड़ा आप निबटाओ, मैं तो सरकार से झगड़ रहा हूं।

क्रमशः

Monday, June 6, 2011

बाबा रामदेव की जय ! भाग- ३


 
      भगव्या वस्त्रांकित व्यक्तिंना आपल्या देशात कायम वेगळ्या चष्म्यातून पाहीले गेले आहे. भगवे वस्त्रे परिधान करणारे बाबा लोक म्हणजे साधू, महात्मा हा पूर्वापार रुढ असलेला एक भोळा समज. त्यामुळे धार्मिक व्यक्तिंनी लबाडी केल्या जाणार्‍या राजकारणासारख्या धूर्त आणि फसव्या लोकांच्या क्षेत्रात पाऊल ठेवू नये असा जनमताचा प्रवाह संपूर्ण देशभर दिसतो. पण बाबा रामदेव यांपेक्षा निश्चितच वेगळे आहे. त्याची कारणे देखील तशीच रोचक आहेत.
 
1.       बाबा रामदेव यांना योगविद्येच्या प्रसाराच्या माध्यमातून जगभर नाव कमाविले.
2.       कधीच कोणत्याही पद्धतीच्या चमत्काराची, जादूची बतावणी केली नाही.
3.       योगविद्येचा ब्रँड या ग्लोबलाईज्ड जगात एका मल्टीनॅशनल फर्म सारखा नावारुपाला आणला.
4.       कधीही कोणत्याही शिबीरात कधीही कोणत्याही प्रकारचे बिभत्स वतर्न नाही किंवा कुठेही कोणाच्या भावना भडकावणे अथवा दुखावण्याचे कृत्य केले नाही.
5.       कधीही धर्माच्या नावाचा किंवा त्याद्वारे प्राप्त झालेल्या अधिष्ठानाचा चुकीचा वापर केला नाही. त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची शालीनता कायम टिकवून ठेवलीये.
6.       त्यांना त्यांच्या या अध्यात्मिक आयुष्यात लाखोंवर भक्त लाभले. त्यांचे त्याच प्रमाणात अनुयायी देखील बनले. साहजिकच शेवटी ते सुद्धा मानवप्राणीच आहेत. एवढे सगळे सोबतीला असताना राजकीय महत्त्वाकांक्षा न बळावल्या तर नवलच!
7.       सगळ्यात  महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशात होउन गेलेल्या आणि सध्या असलेल्या इतर बाबांना देखील लाखोंनी अनुयायी होते पण त्यांनी कधी त्यांच्या राजकीय अनुयायांना भ्रष्टाचाराविरोधात ना लढण्यास प्रवृत्त केले ना ते स्वतः कधी या लढाईत उतरले. मात्र रामदेव बाबा या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरले. ते स्वतः दंड थोपटून मैदानात उतरले.
वरील ७ मुद्दे वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे बाबांचे शालीन चरित्र. या शालीनतेमुळेच त्यांना आज संपूर्ण देशात मान आणि स्वीकृती मिळतेय. त्यांच्या आंदोलनाला आत्ता अण्णांच्या आंदोलनापेक्षाही जास्त यश मिळालयं. ३ जून २०११ ला सरकारचं शिष्टमंडळ आणि बाबा रामदेव यांच्यात पाच तासांची मॅरेथॉन चर्चा होउन देखील काही निष्पण्ण झाले नाही. ४ जून ला मोठ्या दिमाखात आंदोलन सुरू झाले. आंदोलनाचे लोण आत्ता तर सार्‍या देशभर पसरले आणि ज्याची भीती होती तेच झाले. बाबांच्या आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून सरकारने दडपशाही करून रात्री दोन वाजता जबर लाठीमार करून आंदोलन चिरडून टाकले. बाबांची रवानगी जबरदस्तीने दिल्ली रामलीला मैदानातून हरिद्वारला केली गेली. सर्वत्र सरकारच्या नावाचा निषेध केला गेलाय. आत्ताही तो निषेध होतोय. आणि तो व्हायलाच हवा. ज्या पद्धतीने आंदोलन चिरडण्यात आले तो प्रकारच मुळात चुकीचा होता. पोलिसांनी आपल्या या कृष्णकृत्याच्या समर्थनार्थ कोणतेही ठोस कारण सादर केलेले नाही. आंदोलनकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नव्हता मग एवढा अमानुष लाठीमार करण्याची गरजच काय होती ? त्यानिमित्ताने आंदोलनाचा एकुण घटनाक्रम पाहणे निश्चितच योग्य ठरेल.
1.       १ जून : बाबा रामदेव यांचे उज्जैन येथून दिल्ली विमानतळावर आगमन. प्रणव मुखर्जी, पवनकुमार बन्सल, कपिल सिबल आणि सुबोधकांत सहाय यांच्याशी काळा पैसा व भ्रष्टाचार निर्मूलन या मुद्द्यांवर बाबांची चर्चा
2.       २ जून : दोन्ही बाजूंमध्ये बंद दाराआड चर्चा
3.       ३ जून : बाबा रामदेव व कपिल सिबल-सुबोधकांत सहाय यांच्यात चर्चा. बहुतांश मुद्द्यांवर सहमती झाल्याचा उभय बाजूने दावा. उपोषणाला बसण्याच्या निर्धाराचा बाबा रामदेवांकडून सायंकाळी पुनरुच्चार. रामदेवांच्या मागण्यांना केंद सरकारचे टप्प्याटप्यात उत्तर.
4.       ४ जून : रामलीला मैदानावर बाबा रामदेवांचे उपोषण सुरू. सरकारने मागण्या मान्य केल्यास दुपारपर्यंत उपोषण सोडण्याचे बाबा रामदेवांचे पत्र केंद सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, असे पत्र लिहिलेच नसल्याचा बाबांचा दावा. केंदाचा प्रतिदावा. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकांवर ठाम. केंद सरकारकडून रात्री उशिरा बाबांना पत्र.
5.       ४-५ जूनची मध्यरात्र १.०० : मध्यरात्र उलटल्यानंतर दिल्ली पोलीस दबक्या पावलांनी रामलीला मैदानाच्या परिसरात जमा होऊ लागले. स्वत: बाबा आणि त्यांच्या समर्थकांना याची आणि पुढे घडणाऱ्या रामायणाची पुसटशीही कल्पना नव्हती. हळूहळू पोलिसांची संख्या वाढू लागली. सोबतीला राज्य राखीव पोलीस दल आणि दंगल नियंत्रण पथकेही घटनास्थळी दाखल झाली.
6.       १.१५ : पोलिसांनी बाबांच्या समर्थकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. इथे बॉम्ब ठेवला आहे, अशी खोटीच बतावणी करून पोलिसांनी समर्थकांना मानगुटीला धरून बाहेर काढले. त्यामुळे पोलीस आणि समर्थकांत वादाच्या फैरी झडल्या.
7.       १.३० : समर्थक बधत नाही म्हटल्यानंतर पोलिसांकडून जोरदार लाठीमार सुरू. महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकही पोलिसांच्या हल्ल्यातून सुटले नाही. पाठीवर, पोटावर वळ उठेपर्यंत लाठ्या हाणल्या. हे कमी होते म्हणून अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. खुद्द बाबांच्या म्हणण्यानुसार, गोळीबारही झाला. लाठीहल्ल्यात पन्नासहून अधिक जखमी झाले. त्यातील एका महिलेची स्थिती गंभीर.
8.       २.१० : पोलिसांशी हुज्जत न घालण्याचे आणि शांतता राखण्याचे बाबांचे आवाहन
9.       २.३० : दिल्ली पोलीस बाबांना अटक करणार, हे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष समर्थकांनी बाबांभोवती मानवी साखळी करण्यास सुरुवात केली.
10.   २.४५ : मानवी कडे करूनही पोलिसांची जबदरस्ती थांबत नव्हती. पोलीस अटक करणार आणि उपोषण सोडायला भाग पाडणार, हे लक्षात येताच बाबांनी आपले सामान गोळा करण्यासाठी पोलिसांकडे पाच मिनिटांची मुदत मागितली. पोलिसांना चकवा देऊन बाबांनी तीन मीटर उंच व्यासपीठावरून जमिनीवर उडी मारली. कोणालाही काहीही कळण्याच्या आत बाबा समर्थकांच्या घोळक्यात मिसळून गेले. मध्येच समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतल्याचे दिसले. थोड्या वेळानंतर ते दिसेनासे झाले आणि बाबा कुठे गेले? कुठे गेले? याची शोधाशोध सुरू झाली.
11.   ३.०० : पोलिसांना हुलकावणी देऊन बाबांनी एका महिलेचा वेष परिधान केला आणि पुढचा एक तास ते पोलिसांना गुंगारा देत होते.
12.   ४.०० : अखेरीस चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी रामदेव बाबांना हुडकून काढले. दोन महिलांच्या खांद्यावर हात ठेवून चालणाऱ्या 'पांढऱ्या सलवार- कमीझमधील अतिशय जखमी महिले'ने अॅम्ब्युलन्समध्ये चढण्यास नकार दिल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची रवानगी सफदरजंग पोलीस ठाण्यात करण्यात आली.
13.   ४.३० : उपोषणासाठी उभारलेल्या मंडपातून सर्व समर्थकांना बाहेर हुसकावून लावले. त्यानंतर आबालवृद्ध, महिला आणि सर्व नागरिकांनी रस्त्यावर उर्वरित रात्र काढली.
14.   रविवारी सकाळी ९.०० : पहाटे चार वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत ते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात होते. त्यानंतर दिल्ली पोलीस त्यांना घेऊन पालम विमानतळावर पोहोचले. तेथून बाबांना विमानाने डेहराडून येथे पाठविण्यात आले.
15.   ११.४५ : डेहराडूनहून बाबा गाडीने हरिद्वार येथील त्यांच्या पतंजली आश्रमात पोहोचले आणि त्यानंतर ज्येष्ठ सहकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर बाबांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधींवर तोफ डागली. उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार.

क्रमशः

(प्रस्तूत घटनाक्रम हा महाराष्ट्र टाईम्स च्या वेबसाईटवरून घेण्यात आला आहे. यात केवळ घटनाक्रमच केवळ बाहेरून घेण्यात आला आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.)

बाबा रामदेव की जय ! भाग- २

       मुळातच महत्त्वाकांक्षी असलेल्या रामदेव बाबांनी भ्रष्टाचाराविरोधात पुकारलेला लढा खरचं धाडसी पाऊल आहे. महत्त्वाकांक्षी कोणी असावं आणि कोणी असू नये या तर्काचा तर मी मुळीच नाही. आधी सर्न संमतीने लढा उभारायचा ठरलेला असताना मधल्या मध्ये इंडीया अगेंस्ट करप्शन आणि अण्णा हजारे लोकपालच्या लढाईत भाव खाउून जातात. आणि गेल्या दोन ते तीन वर्षांपासून टोटल रिफॉर्म वर बोलणार्‍या रामदेव बाबांनी जंतर मंतरच्या लढाईची सुत्रे पडद्यामागून अगदी चतुराईने सांभाळली होती. तेव्हा त्यांच्या सोबतीला होते त्यांच्याच गोतवळ्यातले दोनवेळा श्री श्री म्हणवून घेणारे साधूबाबा रविशंकरजी.
       श्री.श्री रविशंकर भारतीय समाजकारण, धर्मकारण आणि राजकारण अशा तिन्ही आघाड्यांवर लिलया घेतलं जाणारं एकमेव नाव. कोणतीही कॉन्ट्रवर्सी नावाला अजूनपर्यंत लागलेली नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी हवा तसा मानमरातब. बाबा रामदेव आणि श्री.श्री रविशंकर यांनी जंतर मंजर च्या आंदोलनाची सुत्रे पडद्यामागून चालवली नव्हे तर पळवली. बाबा रामदेव यांच्याकडे देशातला ६० %  मध्यमवर्गाचं पाठबळ, पतंजली योगपीठाच्या माध्यमातून आलेला प्रचंड पैसा, एकुण भारतीय समाजमनामध्ये असलेली स्ंस्कृतीरक्षक, राष्ट्राभिमानी, योगी अशी प्रतिमा, भाषेचं उत्कृष्ट सामर्थ्य, लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि कार्यकर्त्यांकरवी पोहोचवण्याची हातोटी यात ते माहीर. तर दुसर्‍या बाजूला देशातल्या जवळपास व्हाईट कॉलर जॉब करणार्‍यांपैकी ८०% लोकांच्या गळ्यातला ताईत असलेले श्री.श्री रविशंकर, यांच्याकडेही आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून आलेली कोट्यावधींची गंगाजळी, देशातल्या नामवंत उद्योगपती, प्रभावी राजकारणी, पॉलिसीमेकर, टेक्नोक्रॅट, एकुण संपूर्ण मिडीया यांच्यामध्ये असलेला वावर त्यांचे महत्त्व द्विगुणीत करत होता. म्हणूनच या दोघांनीही अण्णांच्या उपोषणाला पाठींबा दिला पण त्यावेळेस स्वतः मात्र उपोषणाला बसले नव्हते. या दोन्ही बाबांनी केजरीवाल अँड हजारे कंपनीने प्रसारमाध्यमांना हाताशी धरून देशातील संपूर्ण अवस्थाच ढासळली  गेलीय आणि ती नीट करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, त्यावर लोकपाल नावाचं जालीम इंजेक्शन आम्ही शोधून काढलंय. ते देण्याचा अधिकार देखील फक्त आम्हालाच मिळायला हवा. आणि एकदा का हे इंजेक्शन दिले की मग बघा कसे सुतासारखे सरळ होतात! हा विचार रुजवून तसे जनमत तयार करण्यात ते १००% यशस्वी देखील झाले. मग काय गल्ली ते दिल्लीपर्यंत फक्त आणि फक्त श्रींमतांच्या पोरींना न्याय मिळावा किंवा ताजमध्यला उच्चभ्रूंवर हल्ला झाल्यावर मेणबत्या घेऊन रस्त्यांवर उतरणार्‍या पोरांनी ऐन उन्हाळ्यात दिवाळी साजरी केली. मग लोकपालाच्या बैठकांची रुपरेषा ठरली. समिती बनली. पण बाबा रामदेवांना मात्र कुठेच स्थान नाही. भूषण पिता-पुत्र दोघांचीही वर्णी लागली. केजरीवाल आणि अगदी अण्णा देखील आले. आंदोलनाच्या यशानंतर सेल्फ मेड सिवील सोसायटीच्या सदस्यांनी श्री.श्री रविशंकर यांच्याशी सलगी वाढवली आणि बाबा रामदेव यांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि येथेच आंदोलनाचे खरे दोन तुकडे झाले. एक गट निर्माण झाला अण्णांचा तर दुसरा गट विरोधातला तयार झाला तो बाबा रामदेव यांचा.
       दुसर्‍या टोकाला अशा सगळ्या प्रकारच्या हालचाली घडत असताना महाभ्रष्ट कॉंग्रेस कार्यकारीणीने डाव साधला. हरिद्वार वरून उपोषणाचं हत्यार खांद्याला लटकावून निघालेल्या रामदेव बाबांना अवास्तव महत्त्व द्यायला सुरुवात केली. अगदी त्यांच्या दिल्लीतील आगमनापासून केंद्रतील बड्या राजकारण्यांनी बाबांना रेड कार्पेट ट्रिटमेंट कशी मिळेल याकडे साकल्याने लक्ष पुरविले. मग व्हायचा तोच परिणाम झाला. सोबतीला आरएसएस, भाजप आणि मित्रपक्षांचा  पाठिंबा असताना देखील जनलोकपालाच्या कक्षेतून पंतप्रधान व न्यायव्यवस्थेला वगळण्याची मागणी केली. सरकार एकदमच आपल्याला रेड कार्पेट ट्रिटमेंट देतेय हे पाहून रामदेव बाबा पण नरमले आणि वरील मागणी करून मोकळे झाले. वास्तविक पाहता आपण बाबांपुढे नमलो आहोत हे दाखवून बाबांना मोठे करताना त्यांच्या मागण्यांची धार कमी करणे आणि अण्णांच्या गटाचा प्रभाव कमी करणे असे दोन डाव एकाच खेळात या कॉंग्रेसच्या का्र्यकारिणीने साधले.
       भारत देश  भ्रष्टाचार मुक्त झालाच पाहीजे. इथल्या भ्रष्ट व्यवस्थेला वठणीवर आणलेच पाहीजे. यात कोणाचेही दुमत असता कामा नये.  बाबा रामदेवांनी हे पाउल उचलले ते निश्चितच धाडसी आहे पण योग्य नाही. ते जरी स्वागतार्ह असले तरी स्विकारार्य नाही. कारण या सर्व प्रकारामागे कुठे ना कुठे तरी व्यक्तिगत द्वेष, स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्याची आकांक्षा, समोरच्या गटाला नीच दाखवण्याची इर्ष्या होती. त्यामागचा त्यांचा हेतू शुद्ध नव्हता. त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या एका रात्रीत मान्य होणे निश्चितच शक्य नाही. याउलट त्यांनी संपूर्ण परिस्थितीला अनुसरून एखादा सुवर्णमध्य सुचवायला हवा होता पण त्यांनी तसे केले नाही. आम्ही तेवढे सोवळे बाकीचे ते भ्रष्ट, देशातली राजकीय व्यवस्था म्हणजे भ्रष्ट लोकांची संस्था असा समज पसरवून देऊन लोकशाहीबद्दल अनास्था निर्माण करण्याची गरजच काय? जर आंदोलन सगळ्यांनी मिळून एकत्र सुरू केले होते तर आत्ता स्वतःने वेगळे होऊन वाट चोखाळण्याची गरजच काय? अण्णांच्या मान्य झालेल्या मागण्या पावसाळी आधिवेशानात सत्यात उतरतायेत की नाही हे पाहण्याइतका संयम बाबा रामदेव बाळगू शकले नाहीत? मग ते कसले योगी ? देशाला संसदीय लोकशाही आहे. भावनेच्या भरात आपण संसदीय लोकशाहीपेक्षा व्यक्तिच्या निर्णयाला जास्त महत्त्व देऊ लागलो तर आपल्या देशात देखील भगव्या पडद्याआडून चालणारी हुकूनशाही अवतरायला वेळ लागणार नाही ..
क्रमशः  

Sunday, June 5, 2011

बाबा रामदेव की जय ! भाग- १


बाबा रामदेव- बाबा रामदेव- बाबा रामदेव-
            फक्त एकच नाव. या नावाशिवाय प्रसारमाध्यमांना एकही बातमी नाही. किंबहूना रामदेव बाबशिवाय इतर बातम्या द्यायच्याच नाहीत असा जणू एकुण मिडीयाने सार्वमताने संमत केलेला ठरावच असावा असे वाटले तर नवल वाटू नये. काहीही असो गेल्या आठवड्याभरापासून या स्वामी रामदेवांनी देशाच्या राजकारणाच्या लाईमलाईट पॉईंट वर ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचाली, प्रत्येक स्टेटमेंटमधून नेहमीच काही ना काही तरी संभ्रम निर्माण झालाय. त्यानिमित्ताने केलेला हा उहापोह.
1.       नावः- रामदेव किशन यादव,
2.       जन्मठिकाणः- हरियाणा
3.       कामः- योगी
4.       स्थापन केलेल्या संस्थाः- पतंजली योग पीठ
5.       संस्थांमार्फत चालणारे कामः- आयुर्वेद आणि योगविद्येचा प्रसार
6.       संस्थांचा जगभर असलेला पसाराः- जगातील जवळपास २० देश
7.       सध्या प्रकाशझोतात असण्याचे कारणः- भ्रष्टाचार विरोधी आंदोलन

     एवढा काय तो बाबा रामदेव यांचा बायोडेटा. संन्यासी असलेल्या बाबा रामदेव यांनी आपल्या धार्मिक कारकिर्दीची सुरूवातच मुळातच एक योग गुरू म्हणून केली. त्यांचा हरीयाणा ते पतंजली आणि पतंजली ते दिल्ली पर्यंतचा प्रवास सगळ्यांनाच ठावूक आहे. आजमितीला या संपूर्ण भारत देशात बाबा रामदेव माहीत नाही असे म्हणणारा एक शेंबडं पोरगं नावाला देखील मिळायचे नाही. त्यांच्या योग शि्बीराला मुख्यमंत्र्यांपासून, केंद्रिय मंत्री ते राज्यपालांची उपस्थिती असायची. कोणत्याही प्रकारचा जादूटोणा नाही, बुवाबाजी नाही, अंगारे-धुपारे नाही म्हणून सुशिक्षितांमध्ये लोकप्रिय व्हायाला त्यांना फारसे कष्ट घ्यायला लागले नाही. सत्य साई बाबा नंतर राजकारण्यांवर सर्वात जास्त प्रभाव टाकणारे बाबा म्हणून रामदेव बाबांचा उल्लेख केला तर ती अतिशयोक्ती ठरू नये. संपूर्ण देशभरात त्यांचे योगासन शिबीरे चालू असतात. त्यांच्या पतंजली पीठाला मिळणार्‍या देणग्याही डोळे दिपवणार्‍या आहेत. याच पतंजली पीठाची संप्पत्ती अब्जावधींच्या घरात असल्याचे बोलले जाते.  या मिळणार्‍या देणग्यांचा हिशोब त्यांनी आजवर दाखवलेला नाही हा भाग वेगळा. स्वतः हे माया ते माया म्हणत लोकांना वैराग्याचे महत्त्व पटवून द्यायचे आणि स्वतः मात्र एसी गाड्यांतून फिरायचे, असा दुटप्पीपणा ते आजतागायत करत आले आहेत.  पण आज अध्यात्म आणि योगासने सोडून त्यांनी राजकारणाचे दार ठोठावलेय, सरकारसाठी अँटी हिरो बनून प्रचंड प्रसिद्धी देखील मिळवली. भ्रष्टाचाराविरोधात उपोषण करून रातोरात नॅशनल स्टार देखील झाले. पण ज्या आंदोलनाची सुरूवात त्यांनी केलीये त्याची सत्यता पडताळून पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण क्रांती ही कधी एका रात्रीत घडून येत नाही. त्याची एक प्रोसेस असते. जेव्हा देशातील अकुण व्यवस्था ही लोकमताच्या विरोधात जाते तेव्हा क्रांतीची खरी गरज वाटू लागते. प्रत्येक क्रांतीचा एक नायक असतो. त्याचे स्वतःचे असे नेतृत्व आणि व्हिजन असते. क्रांतीचा लढा उभारताना लढ्याची ध्येय्य, उद्दीष्टये, परिणाम यांचे जनतेवर होणारे दुरगामी परिणाम यांची सखोल चर्चा होउनच लढ्याची दशा आणि दिशा ठरविणे योग्य, नाहीतर जो क्रांती घडवून आणण्यासाठी असंवैधानिक मार्गांचा वापर करतो तोच मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचारासारखा वापर करून हुकूमशाहीला दारे मोकळी करून देतो. गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने उपोषण करण्याचा जो एक ट्रेंड सुरू झालाय तो आपल्या एकुण समाजाला उपरोल्लिखित परिस्थिताकडे नेणारा आहे.
       वास्तविक पाहता बाबा रामदेव यांचे उपोषण हे भ्रष्टाचार मुक्त भारत साकारण्यासाठी आहे आपण त्याचे स्वागत करायलाच पाहीजे. पण त्याची पार्श्वभूमी समजावून घेतल्याशिवाय खरे मुद्दे कळणार नाहीत. जवळपास दोन वर्षांपूर्वी स्विस बँकेत असलेला काळा पैसा हा सर्वात जास्त भारतातूनच येत असल्याच्या बातम्या पुढे आल्या. त्यातूनच अरविंद केजरीवाल यांनी इंडिया अगेंस्ट करप्शन च्या माध्यमातून देशातल्या बड्या नॉन पॉलिटिकल पण प्रभावी व्यक्तिमत्त्वांना एकत्र करून भ्रष्टाचार विरोढी आंदोलन उभारले. सुरूवातीला आंदोलनाला काहीच यश मिळाले नाही. जवळपास पावणे दोन वर्षांच्या कालावधीत या आंदोलनाला कुणी मुंगीएवढा पण स्पेस दिला नाही आणि आत्ता हे अकुण डब्ब्यात जाणार असे चित्र असताना अचानक चक्रे फिरली कालपरवापर्यंत गल्ली बोळातलं आंदोलन म्हणवून हिणवल्या गेलेल्या आंदोलनाला एकदम प्राईम टाईम ची स्पेस मिळायला लागली. इंडिया अगेंस्ट करप्शन च्या प्रत्येक हालचालींना हेडलाईन मिळू लागली. असे नेमके का झाले असावे ? ह्या प्रश्नाच्या उत्तरातच या आंदोलनाचा एकुण चेहरा लपलेला आहे, आणि तो एकुणच खुप मजेशीर देखील आहे.
       २०११ सालाचा अंत आणि सुरूवातच मुळात एका नव्या क्रांतीच्या पर्वाला जन्माला घेऊनच झाली. ट्युनिशिया, इजिप्त आणि नंतर लिबीया सारख्या हुकूमशाही राष्ट्रांत बोकाळलेला भ्रष्टाचार मुळासकट उखडून टाकण्यासाठी तेथील जनतेने केलेला उत्फुर्त उद्रेक जगभरातल्या मिडियाने टिपला. त्या उद्रेकाला यश देखील मिळाले, अर्थात ते मिळण्यामागे तेलाच्या राजकारणाचा कसा सहभाग होता हा मुद्दा वेगळा. भारतात २०१० साली  सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली होती. जनमताने भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार्‍यांविरोधातल्या रागाचा परमोच्च बिंदू एव्हाना गाठला होत. वास्तविक पाहता आखाती देशांमध्ये घडलेल्या प्रकार हा जरी क्रांतीत मोडत असला तरी त्याचे इप्सित ध्येय्य अजूनदेखील साधले गेलेले नाहीये. आखाती देशातील विद्रोह भारतीय मिडीयाने अत्यंत चवीने चघळला होता. त्या निमित्ताने भारतातील पत्रकारांनी आपल्याकडे अशा प्रकारची क्रांतीची कशी गरज आहे या विषयाला तोंड फोडले. आणि मग काय भारतात देखील लोकपाल चा लढा सुरू झाला. लोकपाल चा लढा कसा फसवा होता हे मी याआधीच सविस्तरपणे मांडले आहे.
     
        अण्णांचे उपोषण सुरू झाले, बराच काळ लांबले. आंदोलनाचे लोण देशभर पसरले.
लोकांनी रस्त्यावर उतरून, जंतर मंतर सारख्या ठिकाणांना तहरीर चौकाचं स्वरूप प्रदान करून देउन हा लढा उभारला  तो तात्पुरता जिंकला. तो जिंकण्यासाठी जंतर मंतर च्या आंदोलनाला स्वांतत्र्यलढ्याची आभासी प्रतिमा निर्माण केली गेली. (नेमके हेच चित्र रामदेवबाबांच्या आंदोलनाच्या वेळी देखील उभारण्यात येतंय.) शेवटी सरकार झुकलं अण्णांच्या मागण्या झाल्या. राळेगणसिद्धीचे अण्णा रातोरात गांधी बाबा बनले. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, श्री श्री रविशंकर, किरण बेदी, बाबा रामदेव, स्वामी अग्निवेश यांनी एकत्रितरित्या सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाले, पण यात भाव खावून गेले ते फक्त अण्णा. बाकी कुणालाच म्हणावे तसे एक्सपोझर मिळाले नाही. सारे यश अण्णांच्या नावावर लिहीले गेले.  आणि येथूनच बाबा रामदेव यांच्या उपोषणाच्या कहाणीचा जन्म झाला.
क्रमशः


 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons