Tuesday, November 8, 2011

नामांतराच्या जखमा... आणि विद्यापीठ प्रवेशद्वाराची चाळीशी






वयाने चाळिशी ओलांडली की वार्धक्याकडे प्रवास सुरू होतो, असे म्हणतात. वार्धक्य हे तसे सर्वार्थाने दूर्लक्षित जीवन. मग ते मानवी जीवन असो की, निर्जीव वास्तूचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. जगात सगळ्यात जास्त गाजलेलं नाव. तेथील विद्यादानाच्या अद्भूत पद्धतीमुळे नव्हे तर.. मानवी अधिकारा मिळवण्यासाठई झालेल्या संघर्षामुळे. विद्यापीठाचे नाव समोर आले की चित्र उभे राहते ते ऐतिहासिक सामाजिक समतेच्या परिवर्तनाच्या लढ्याचे ! विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचे. ह्या लढ्याने काय मिळालं हा वादातीत विषय आहे आणि राहील देखील. पण नामांतराच्या चळवळीनं आमच्याकडून जे हिरावून घेतलं ते कधीच परत मिळणारं नव्हतं. आज त्याच विद्यापीठाच्या या महाकाय प्रवेशदग्वाराच्या वास्तूला ४० वर्षे पूर्ण झालीत. त्या नामांतराच्या एकुण चळवळीवर आणि त्याच्या परिणामांवर ह्या चाळीशीच्या निमित्ताने टाकलेला हा प्रकाश..


      
 

     सत्तरच्या दशकात महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह पूर्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने तमाम आंबेडकरी संघटनांनी एका मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करून त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशा प्रकारच ठराव देखील मंजूर केला गेला. एव्हाना पँथर देखील फाटाफुटीला बळी पडली होती. या फाटाफुटीमुळे राज्यभरातील पँथर्स मध्ये खदखदणार्‍या अंसोताषाला प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले, दयानंद मस्के, कमलेश यादव, उमाकांत रणधीर, मारुती सोनवणे, डी.एम. गायकवाड सारख्या खमक्या तरुणांनी वाचा फोडली. या सर्व तरुणांनी एकत्र येवून औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या सभेत पँथर ला पुन्हा एकदा जीवदान मिळवून दिले. त्यावेळी झालेल्या बैठकीत पँथरची भविष्यातील वाटचाल निश्चित करताना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर हाच मुख्य अजेंडा असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री आणि पुलोद प्रयोगाचे प्रणेते असेलेले शरद पवार यांच्याकडे तसा प्रस्ताव देखील मांडण्यात आला. पण त्याला योग्य तो प्रस्ताव न मिळाल्याने संतापलेल्या पँथर्सनी मुंबईतील मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. नामांतर मोर्चास महाराष्ट्रातील  खेड्यापांड्यातून लाखोंच्या संख्येने पँथर सहभागी झाले होते. त्या पँथरच्या ताकदीच्या रेट्यामुळे मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराचा ठराव विधीमंडळात संम्मत करताच त्याच रात्री मराठवाडा पेटला. मराठवाड्यातील हिंदू धर्मीय सनातनी जातीयवादी गावगुंडांचा पोटशुळ उठला व त्यांच्या तरुण मुलांना भडकाऊन देऊन महारवाडे पेटवा, त्यांची घरे जाळा, त्यांना बेदम मारा, त्यांच्या लहान मुलांना व महिलांनाही झोडपा असे आदेश देऊन भयानक दंगल ह्या जातीवादी औलादींनी घडवली. ही दंगल भयानक व अतिशय क्रर होती.

     
    
दंगलीत जातियवादी गावगुंडाना दलित पँथरनेही जेरीस आणुन, तरुण पँथर त्याचा मुकाबला करुन रात्रंदिवस लढत होते. जातीयवादी वृत्तीचे सनातनी कट्टर हिंदत्ववादी औरंगाबादचे गोविंदभाई श्रॉफ याने लोकांना भडकविण्याचे व दलित वस्त्यांचा नायनाट करुन त्यांना बेचिराख करावे म्हणून नामांतर विरोधी कृती समितीचे गुंड पाच जिह्यांतील खेड्यापाड्यांतील दलित वस्त्यांवर जाऊन रात्री पेट्रोलचे जळते गोळे फेकून घरांना व झोपड्यांना आगी लावत असे. त्याचवेळी नामांतरवादी कृती समितीमध्ये कॉलेजचे तरुण आणि पँथर्स जश्यास तसे उत्तर देत असत. जवळ जवळ महिनाभर ही दंगल चाल होती. पोलीस अनेकदा हिंदूचीच बाजू घेत असत.दलित समाज अल्पसंख्याक असून देखील महिलाही लढतांना अग्रभागी राहून दलित पँथरच्या तरुणांना अन्यायाविरुध्द लढण्याचे बळ देत होत्या.



     भिमा कोरेगांव येथील महार बटालियनने पेशव्यांना पळवून लावून त्यांना पराभूत केले. त्याच सामर्थ्याने मराठवाड्यातील दलितांनी दंगलखोर, जातीयवादी गावगुंडांशी मुकाबला  केला. उदगीर, जळपोट, नांदेड या शहरात व तेथील खेड्यापाड्यांतील दलितांवर अतिशय अन्याय , अत्याचार केले गेले. पोचीराम कांबळे यांना गावगुंडांनी हाल हाल करुन ठार मारले. ते इतके भयानक होते की २०० लोकांच्या जमावाने पोचीराम कांबळेला पकडून त्यांचा अमानुष छळ करुन पहिला त्यांचा हात काढण्यात आला व गावगुंड पोचीरामला मारत मारत म्हणायचे, `` सांग पोच्या तू जयभिम करणार का''  पोचिरामला इतक्या वेदना होत असतानाही म्हणाला, `` जयभिम म्हणणार''.  नंतर दुसरा हात काढला दोन हात काढल्यानंतर एक पाय काढला तरी पोचीराम चिडून `जयभिम'  म्हणून ओरडायचा नंतर दुसराही तोडला तेंव्हा पोचीरामचे रक्त सांडलेले होते.पोचीरामचे दोन हात व दोन पाय मराठवाड्यातील हैवानांनी तोडले होते. तेवढ्यातही पोचीराम जयभिम म्हणत होता, पोचिराम याचे फक्त तोंड राहिले होते. त्यांनी बजावले, ``पोच्या, आता तुझे फक्त मुंडके राहिले आहे. सांग जयभिम करणार का? जयभिम'' म्हणून बोलत असतांना त्या हरामखोरांनी तलवारीने मान छाटताच जयभिम हा शेवटचा नारा बोलला. सर्व रक्त जातीयवादी गुंडांच्या अंगावर उडून पोचीरामच्या रक्ताने अनेक पँथर निर्माण झाले.नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील टेंभुर्णी ह्या गावी पशुलाही लाज वाटेल असा प्रकार केला होता. जनार्दन मेवाडे यांनाही हाल हाल करुन ठार केले होते.असे असतानाही मराठवाड्यातील नामांतराबाबतची दंगल पत्रकारांना लिहूदेखील वाटत नव्हती. दंगलग्रस्त भागात मुंबईतून दलित पँथरचे नेते प्रा.अरुण कांबळे, रामदास आठवले आले, तेव्हा वातावरणात पँथर काय करतील हे सांगता येत नव्हते.सर्व लोकांना ह्या नेत्यांनी शांतता ठेवण्यात यावी असे सांगितले.



प्रा.अरुण कांबळे म्हणाले,
`` सांभाळून ठेवा राख जाळलेल्या घरांची
संपली नाही लढाई नामांतराच्या लढ्याची''



       ह्या गंभीर परिस्थितीमुळे पँथरला शासन घाबरुन राहत होते.गंगाधर गाडे यांच्या अटकेमुळे सर्व पँथर चळवळीचा भार तरणाबांड बिबळ्या वाघ रामदास आठवलेंवर पडला. रामदासच्या अंगात पँथर संचारला होता.रामदास आठवलेंना मुंबईत घरदार नव्हते, सिध्दार्थ हॉस्टेल रु.नं. ५० हे त्यांचे निवासस्थान व राज्याचे पँथर कार्यालय होते.रामदास आठवलेंचे लग्न झाले नव्हते.तरणाबांड बिबळ्या वाघाच्या ढांगा खेड्यापाड्यात पँथर तयार करण्यास जात होत्या.रिपाइंचे ऐक्य टिकले नाही रामदास कॅबिनेट मंत्री झाले शरद पवार यांनी आठवलेंची ताकद ओळखून १७ वर्षे सत्तेत घेतले.मंत्री असतांना रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री शरद पवार यांना विश्वासात घेऊन १४ वर्षांचा दलितांच्या अस्मितेचा नामांतराचा प्रश्न आता तरी सोडविण्याचे साकडे घातले. १४ जानेवारी दिवस निवडला आणि राज्यातील प्रत्येक पोलीस ठाणे वरिष्ठांना आदेश दिले. पोलिस पाटील व सरपंचांची बैठक `सह्याद्रीवर' बोलविली व तेथे सांगितले की एकाही दलिताचे घर जळताना दिसले नाही पाहिजे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक गावच्या पोलीस पाटील व सरपंचावर असणार विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मंजुर करताच संपुर्ण दलित वस्त्यांत दिवाळी साजरी झाली.




     दरवर्षी १४ जानेवारी रोजी भोळीभाबडी आंबेडकरी जनता या गेटची मनोभावे पूजा करते.. जणू काही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत. या श्रद्धेने ते गेटपुढे नतमस्तक होतात..एवढे मोठे पावित्र्य या गेटला दिले असेल तर मग आज ही जनता किंवा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते.. विद्यापीठ प्रशासनालाही गेटच्या ४
0 व्या वर्धापन दिनाचे भान का बरे नसावे? वर्षातून केवळ तीन वेळेसच या गेटला रोषणाई केली जाते. त्यापैकी एकदा १४ जानेवारी रोजी नामांतर वर्धापन दिनानिमित्त. दुसरे १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य म्हणून आणि तिसरे म्हणजे २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असतो तेव्हा. चार तपांचा साक्षीदार असलेल्या या गेटच्या उभारणीचा आज वर्धापन दिन होता. केवळ सभा-समारंभ घेतल्यावरच ती वास्तू पुनीत होते असे नव्हे तर किमान या दिवशी सदरील वास्तूची आठवण जरी केली तरी ते पुरेसे आहे; पण ते या गेटच्या नशिबी नाही, हे दुर्दैव!


या गेटच्या उभारणीचा इतिहासही तसा रंजनकारकच आहे. ज्या अभियंत्याने ही सुंदर वास्तू अवघ्या ३५ दिवसांत उभी केली ते विद्यापीठाचे तत्कालीन अभियंता कुलदीपसिंग छाबडा आजही हयात आहेत. सध्या त्यांचा सिंधी कॉलनीत निवास आहे. यासंदर्भात ते सांगतात की, डॉ. आर. पी. नाथ यांनी १९७१ मध्ये ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात होणार्‍या पदवीदान समारंभासाठी त्यांनी तत्कालीन गव्हर्नर नवाब अली यावर जंग यांना निमंत्रित केले होते. या समारंभापूर्वी विद्यापीठ गेटची उभारणी करावी, असा डॉ. नाथ यांचा आग्रह होता. एवढय़ा अल्पकाळात एवढी मोठी वास्तू उभारण्यास तेव्हा शहरातील एकाही वास्तूविशारदाने अनुकूलता दर्शविली नव्हती. मग हे आव्हान विद्यापीठाचे निवासी अभियंता कुलदीपसिंग छाबडा यांनी स्वीकारले. त्यांनी विद्यापीठातील मजूर सोबत घेऊन लोडबेअरिंग या संकल्पनेतून ही वास्तू उभारण्यास सुरुवात केली. ६ नोव्हेंबर १९७१ ला या गेटच्या उभारणीचे काम सुरू केले अन् १० डिसेंबरला अर्थात अवघ्या ३५ दिवसांत या सुंदर अशा वास्तूचे लोकार्पण झाले. विद्यापीठाचा लोगो या वास्तूद्वारे साकारला आहे. यामध्ये अजिंठा येथील बौद्ध शिल्पही साकारण्यात आलेले आहे. या गेटची उंची २९.३ फूट आणि रुंदी ३६ फूट आहे. गेटच्या भिंती ६ फूट एवढय़ा रुंद आहेत.

      
    जोपर्यंत हे विद्यापीठ आहे तोवर त्याचे प्रवेशद्वार आहे. हेच प्रवेशद्वार आमच्यासारख्याना आणि आमच्यानंतर येणार्‍या कैक पिढ्यांना त्या जुलूमाची, त्या अत्याचाराची, त्या त्यागाची, शौर्याची आणि झुंजार लढ्याची आठवण करून देत राहील. त्यातूनच नवे चैतन्य कायम संचारत राहील. नामांतर लढ्याची आठवण आंबेडकरी समाजाला सदैव स्फूर्ती देत राहो.

प्रस्तूत लेख हा दै महानायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात अर्जूनराव  कदम यांनी लिहलेल्या लेखाला व विजय सरवदे यांच्या लेखाला संकलित करून येथे टाकताना मी सुद्धा त्यात माझे योग्य योगदान टाकले  आहे. लेखकाला त्याच्या लेखनाचा मालकी हक्क मिळायलाच हवा परंतू  हा लेख म्हणजे आंबेडकरी चळवळीची मालमत्ता असल्याने तो मी कदम साहेबांना न विचारता जरी टाकला तरी ते कोणतीही हरकत घेणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे.

लेखकः- अर्जूनराव  कदम
लेखकः- विजय सरवदे
संकलकः- वैभव छाया

सप्रेम जय भीम ....

महाराज यशवंतराव होळकर

महाराजा यशवंतराव होळकर 
लेखक : संजय सोनवणी
प्रकाशक : पुष्प प्रकाशन
आवृत्ती : पहिली.
पानं. : १४०
किंमत: १२५ रुपये






            बहुजन नायकांच्या शौर्याच्या गाथा, कथा अन इतिहास लिहताना प्रचंड प्रमाणात जातियवाद करणारा या देशातील बुद्धिजीवी(?) वर्ग, इतिहास संशोधक व वर्चस्ववादी यानी अत्यंत खालच्या थराला जाऊन जमेल तितकं बहुजन कर्तूत्व दडपण्याच्या अनेक मोहिमा हजारो वर्षापासून मोठ्या शिताफिनं चालविल्या. या वर्चस्ववादी लोकानी मनूवादी लोकांचं उदात्तीकरण करताना बहूजन नायक जे सूर्याच्या तेजाप्रमाने त्या त्या काळात स्वयंप्रकाशीत होते त्यांचा सर्व आघाड्यावर तेजोभंग केला. कित्येक नायकांचा इतिहास बाटविला, दडपून टाकला एवढ्यावर न थांबता काहीना तर चक्क त्या काळातील खलपुरुष बनवून लोकांसमोर पेश केले. बळीराजा, बोधिसत्व रावण, बृहद्रथा सारख्या अनेक बहुजन नायकांचा उपमर्द करणारा इतिहास(पुराणे) लिहून ठेवण्यात आले. अशाच एका बहुजन नायकाला अगदी काल परवा म्हणजे इंग्रजांची सत्ता या मातीत स्थिरावण्याच्या प्राथमिक टप्प्यात असताना सर्व मनुवादी लेखकानी चक्क लुटारु, दरवडेखोर वगैरे शेलक्या वाहून बदनाम केले. पण नशीबाने इंग्रजी लेखकांच्या तटस्तवृतीमुळे इतिहासाच्या मातीत पुरलेला आमचा बहुजन नायक संजय साहेबानी मोठ्या कष्टानी वरील पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या पुढे उभा केला आहे. या बहुजन नायकाचे नाव आहे, “महाराजा यशवंत होळकर.
शिवाजी महाराजानी मराठी राज्याची पायाभरणी केली. त्या नंतर अनेक लोकानी हे महाराजांचं राज्य उपभोगलं. कित्येकानी ते टिकविण्यासाठी प्राण पणाला लावले. त्यातीलच एक अनूल्लेखानी मारलेलं नाव म्हणजे महाराज यशवंत होळकर होय.
      मल्हारबांचे दत्तक पुत्र (नात्याने पुतणे) तुकोजीराव होळकर यांच्या चार (काशीराव, मल्हारराव-II, विठोजीराव व यशवंतराव) पुत्रापैकी सर्वात धाकटे पुत्र म्हणजे यशवंतराव होळकर. अहिल्याबाईंच्या मृत्यू नंतर (१७९५) तुकोजीराव गादीवर आले. पण दुर्दैवानी दोनच वर्षात त्यांचा पुणे येथे मृत्यू झाला (१७९७). ३ डिसेंबर १७७६ रोजी यशवंतरावांचा जन्म झाला. वयाच्या १९ व्या वर्षी खर्ड्याच्या निजामा विरुद्ध झालेल्या युद्धात (१७९५) यशवंतरावानी दहा हजार सैन्याचे नेतृत्व करीत निजामाला खडे चारले. त्या नंतर पेशव्याशी तह घडवून आणण्यासाठी निजामानी यशवंतरावाकडे गळ घातली. एवढ्या लहान वयात केवढं जबाबदारीचं काम अंगावर पडलं.

मल्हारराव-II यांचा पुण्यात खून
      दौलतराव शिंदे (होळकरांचे पारंपारीक हाडवैरी) यानी १४ सप्टे १७९७ रोजी पुणे येथे मसलतीसाठी आलेल्या मल्हाररावाना धोक्याने गाठून ठार केले. यांची गरोदर पत्नी जिजाबाईस शिंद्यानी कैदेत टाकले. या कैदवासातच खंडेराव-II याचा जन्म झाला. मल्हाररावाची हत्या करुन दौलतराव शिंद्यानी होळकरशाही संपवून होळकरी साम्राज्य घशात घालण्याचा प्रयत्न केला. पेशव्यानी सुद्धा शिंद्याना या कामास अनूमोदन देत होळकरांसारखे दौलतीचे जुने सेवक यांच्याशी दगाबाजी केली. काशीराव होळकराना सुद्धा शिंद्याना नाना लोभ दाखवून अंकित ठेवले. आता संपुर्ण होळकरशाही आपलीच झाली अशा मस्तावलेल्या विचारानी होळकर शाहीचे एक एक महाल जप्त करण्याचा सपाटा शिंदेनी चालविला. शिंदे व पेशवे यांनी सामूहिकरित्या चालविलेल्या या होळकरशाहीच्या विरोधातील लढ्यात उतरून शिंद्यांशी सामना करावयास यशवंतराव अन विठोजी आजूनतरी वयाने व अनूभवाने खूप लहान होते. पण शरणागती पत्कारतील ते होळकर कसले. शिंदे व पेशव्यांच्या लोभी व सत्तापिसासू लोकांचा बिमोड करण्यासाठी होळकरी साम्राज्यातून एक नवे वादळ आकार घेते अन शिंदे व पेशवे यांचा पुरता नायनाट करते.

पुण्यावर हल्ला
      पेशवे अन शिंदे दिवसेंदिवस माजखोर बनत गेले. यशवंतरावानी समेट घडवुन आणण्याचे अनेक प्रयत्न केले पण होळकरशाही घशात घालण्याच्या लोभापायी शिंद्यानी सर्व विनवण्या धुडकावून लावल्या. आता मात्र शिंदे व पेशव्यांना होळकरी तलवारीची धार दाखविणे हा एकमेव पर्याय उरतो व यशवंतराव अजस्त्र सेना (जी स्वबळावर उभारली) घेऊन पुण्याच्या दिशेनी झेपावतात. हडपसरला दोन्ही सेना आमने सामने येतात, युद्धास तोंड फुटते व या लढ्यात शिंदे अन पेशव्यांची पोलादी सेना चिरडून टाकणारी होळकरांची वादळी सेना मोठ्या शौर्याने लढते. यशवंतरावाच्या झंझावाता पुढे टिकाव न लागल्यामूळे पळपुटा बाजीराव रायगडास पळून जातो. शिंद्यांच्या सेनेला लोखंडाचे चने चारल्यावर होळकर पुण्यात दाखल होतात. यशवंतरावानी शिंदे व होळकरांत समेट घडवुन आणण्याचे अनेक प्रयत्न केले, पण मस्तावलेल्या शिंद्याना व पेशव्याना याची गरजच वाटली नव्हती. याची परिणीती पुण्याच्या युद्धात होते व पेशवे-शिंद्याना तलावारीच्या टोकाने पाणि प्यावे लागते. युद्धात शिकस्त खाल्यावर बाजीराव रायगडास पलायन करतो. कित्येक विनवण्या करुन सुद्धा पेशवा पुण्यात येण्यास तयार न झाल्यामूळे अमृतरावाना तात्पुरते कारभारी नेमून यशवंतराव निघून जातात. यशवंतरावानी पाठ दाखवताच अमृतरावानी पुण्यात खणत्या लावून लोकांची लूट केली अन पाप यशवंतरावांच्या माथी मारले. याच दरम्यान तिकडे पेशवा इंग्रजाच्या छत्रछायेत जातो व पेशवाई गो-यांकडे गहान टाकतो. ६ डिसे १८०३ रोजी वसईचा तह करुन पेशवा इंग्रजांचा अंकित झाला.

मॉन्सनचा पराभव:
      यशवंतरावांचे इंग्रजी सैन्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष होते. मॉन्सन (गोरा अधिकारी) मोठा फौज फाटा घेऊन जयपूरहून निघाला. होळकरांचा टोंक-रामपुरा विभाग जिंकुन पुढे कुच केली. १० जुलै १८०४ रोजी यशवंतरावानी मुकुंदरा खिंडीजवळ मॉन्सनला गाठले. होळकरी सेना मोठ्या वीर्यानी लढली. इंग्रजी सेनेची धूळघाण उडवित होळकरानी बढती घेतली. गोरा अधिकारी मैदानातून पळून जातो. होळकरानी राजस्थान, मध्यप्रदेश ते चंबलचं उभं अरण्य दौड मारून इंग्रजांची दाणादाण उडविली. इंग्रज सैन्याचा मोठा दारुगोडा जप्त केला.

दिल्लीवर स्वारी:
      इंग्रजी सेनेने होळकरी सेनेचा असा धसका घेतला की यशवंतरावाचे नुसते नाव ऐकली तरी इंग्रज अधिका-यांचा थरकाप उडे. इंग्रजांचा बंदोबस्त करुन दिल्लीच्या पातशाहला इंग्रजांपासून मुक्त करण्याची योजना तयार केली. आपली अजस्त्र सेना, मोठ्या वीर्याने लढणारे सैनिक व दारुगोळ्यासहित होळकरी सेना दिल्लीच्या दिशेनी झेपावते. ८ ऑक्टोबर १८०४ रोजी होळकरानी दिल्लीला वेढा घातला. दोन्ही सैनिकांमधे तुडूंब युद्ध होते. यशवंतरावाच्या नेतृत्वाखाली होळकरी सेना पराक्रमाची पराकाष्ठा करते. इंग्रजी सेनेच्या पोलादी भींती होळकरी तोफानी उध्वस्त होतात. शिस्तबद्ध लढा देणा-या सैनिकांची अक्शरश: दानदान उडते. पण याच दरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडते. यशवंतरावांचा जीवलग मीत्र, सल्लागार व सेनानी भवानी शंकर खत्री यशवंतरावाशी गद्दारी करतो. ऐनवेळी दगाबाजी करुन मोठी सेना सोबत घेऊन इंग्रजांच्या बाजूला उभा होतो. याचा फटका बसणे स्वाभाविक होते. दिल्लीची लढाई मोठ्या वीर्याने लढविणारी होळकरी सेना नजरेच्या टप्प्यातील विजय एका दगाबाजामूळे गमावून बसते. दिल्लीतिल चांदणी चौकातील, ’निमक हरामकी हवेल याच दगाबाज खत्रीची हवेली होय.

भरतपूरचे युद्ध:
      जनरले लेकने यशवंतरावाना भरपूरच्या किल्यास वेढा देऊन कचाट्यात धरले. ७ जाने १८०७ ला त्यानी किल्यावर तोफांचा भडीमार सुरु केला. दोन दिवसाच्या अतीव परिश्रमान नंतर किल्याच्या तटाचा काही भाग कोसळतो. पण त्यातून इंग्रजी सेना शिरण्या आधिच होळकरी सेनेनी बाहेर उडी टाकून इंग्रजाना तलवारीने पाणि पाजले. लेकने मोठ्या डावपेचाने अनेक हल्ले चढविले, प्रत्येक हल्ला तितक्याच जोमाने परतविण्यात आला. इंग्रजी सेनेची शिस्त उधडून लावणारा महाराजा यशवंतराव खुद्द त्या पडलेल्या भगदाडातून मोठी सेना घेऊन इंग्रजांवर तुटून पडलो. या युद्धात इंग्रजी सेनेची दाणादाण उडाली. दिसेल त्या वाटेने गोरे पळू लागले. होळकरी सेना मोठ्या धैर्याने व वीर्याने रणांगणात शत्रूला तलवारीची धार दाखवू लागली. हा हा म्हणता इंग्रजी सेनेचा पाडाव झाला अन होळकरांचा विजयी. या युद्धाच्या अभूतपुर्व विजयामूळे युरोपात भारताचा नेपोलियन म्हणून यशवंतराव होळकर यांची ख्याती पोहचली.
अशा प्रकारे इंग्रजी सेनेला धूळ चारणारा हा महान राजा सर्व हेवेदावे विसरुन शिंदे व भोसल्याना देशाच्या स्वातत्र्यासाठी इंग्रजां विरुद्ध पेटुन उठण्यास आवाहन करतो. भारताला इंग्रजांच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन हाडवैरी शिंद्यांच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजांविरुद्ध लढण्यास मैदानात उतरतो. पण शिंदे ते शिंदेच. पराकोटीची राजतृष्णा, होळकरांच्या मालमत्तेवर लोभी नजर व आतून अत्यंत द्वेषमूलक अन राजलालसेनी झपाटलेले शिंदे ईथेही धोखाधडी करतात. त्यामूळे यशवंतराव परत एकदा हताश होऊन एकला चलोच्या मार्गाने जातात. दक्षिण भारता पासून थेट पंजाब, लाहोर पर्यंत स्वत: दौड मारुन प्रत्येक राजाची भेट घेणारा व इंग्रजांविरुद्ध लढा उभारण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारा यशवंतराव होळकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जनक आहे.

स्वातंत्र्य लढयाचे प्रणेते:
      उभ्या आयुष्यात एकही लढा न हारणारे महाराज यशवंतराव या बाबतीत नेपोलियनलाही मागे टाकतात. अनेक तह करुन राज्य टिकवून ठेवणा-या तहबहाद्दूरांपेक्षा एकही तह न करणारा यशवंत, खरच नावा सारखा यशवंत होता. शुन्यातून सैन्य़ उभारुन शिंदे, पेशवे ते इंग्रजा पर्यंत सर्वाना खडे चारणारा वीरपुत्र महाराज यशवंतराव होळकर म्हणजे या मातीला मिळालेलं एक अभूतपूर्व वरदान होतं. इंग्रजांचा धोका ओळखून पारंपारीक शत्रूशी वैर मिटवून युद्धास सज्ज झालेले यशवंतराव हे खरे भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते होत. इंग्रजांचं वर्चस्व वाढताना पारतंत्र्याची चाहूल सर्वप्रथम जरी कुणाला लागली असेल तर ती होळकराना. सर्व हेवेदावे विसरुन इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याचा विचार मांडणारे पहिले भारतीय म्हणजे होळकर. शिंदे, पेशवे, भोसले, शिख, पासून तर दिल्लीचा पातशाह पर्यंत उभा देश इंग्रजांच्या ओंजळीने पाणी पिऊ लागला होता. इंग्रजांचे मांडलिकत्व स्विकारुन सुखासीन राज्य करण्यात सर्वानी धन्यता मानली होती. नेहमीच्या लढाया व कटकटीतून मुक्तता मिळविण्याचा एक उपाय म्हणजे इंग्रजी मांडलिकत्व असं समीकरण बनत गेलं होतं. चहू बाजूनी इंग्रजी साम्राज्याचा वेढा पडू लागला होता. एकंदरीत परिस्थीती मनोधैर्य खचवून टाकणारी होती. पण या परीस्थीतीतही राष्ट्रप्रेमानी पेटून उठलेला एकमेव मातृभक्त म्हणजे यशवंतराव. यशवंतराव हे एकमेव राजे होते ज्यानी आयुष्यात कधीच इंग्रजाना थारा दिला नाही. शेवट पर्यंत मोठ्या शौर्याने लढले, स्वाभिमानाने जगले. इंग्रजानी भारतातील सर्व शासकांशी आपल्या अटीवर तह करण्याचा सपाटा लावला होता. पण होळकरांच्या बाबतीत चित्र उलट होतं. होळकरांच्या अटीवर कसलीच खंडणी न लादता तह करण्यास इंग्रज एका पायावर तयार होते. यशवंतराव मात्र विनाअट विनाखंडणी तहास सुद्धा तयार झाले नाहीत. ते स्वत: जिवंत असे पर्यंत संपुर्ण भारत काबीज करण्याचा इंग्रजांचा मनसूबा कधीच पुर्ण झाला नाही. त्यांच्या नंतरही त्यांची वीर कन्या भीमाबाईने इंग्रजांशी मोठ्या शौर्यानी लढा दिला. अशा या पराक्रमी व इंग्रजाना दारातही उभं न करणा-या यशवंतरावांचा तेजोमय इतिहास सर्वानी वाचाव.
हा सर्व इतिहास उलगडल्या बद्दल समस्त बहुजन समाज सोनवणी साहेबांचा आभारी असेल. प्रत्येक बहुजनाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे व आपला तेजोमय इतिहास समजून घेतलाच पाहिजे. 












--- मधुकर रामटेके यांच्या ब्लॉगवरून साभार ---- 

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons